Chandrapur राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर हे ५ जुलै रोजी चंद्रपूर औद्योगिक नगरीत दाखल झाले. त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी रयतवारी कॉलरी परिसरात भेट देऊन, तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि विविध सामाजिक संघटनांसोबत चर्चा केली. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आणि उद्योग आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील व दक्षिण भारतातील अनेक कुटुंबे गेल्या ८० वर्षांपासून येथे स्थायिक आहेत. Chandataknews
या भागातील तेलुगू भाषिक आणि उत्तर भारतीय अनुसूचित जातींच्या नागरिकांनी आयोगाच्या सदस्यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या. या नागरिकांनी सांगितले की, ते पिढ्यानपिढ्या चंद्रपूरमध्ये राहत असून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक जीवनात पूर्णपणे समरस झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये सेवा बजावत आहेत.
मात्र, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवताना त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक अधिकारी अर्जदारांचा मूळ भाषा, मूळ राज्य किंवा दस्तऐवजांच्या स्वरूपाचा हवाला देऊन अर्ज नामंजूर करतात किंवा प्रक्रिया विलंबित करतात. यामुळे विद्यार्थ्यांना शासकीय लाभ, शिष्यवृत्ती, शिक्षण आणि नोकरीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये अडचणी येतात.
वड्डेपल्ली रामचंदर यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि समस्या सोडविण्यासाठी आयोगाच्या स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, या नागरिकांना हक्काचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले








