◆ इंधन बचतीसाठी खाकीचा पुढाकार
◆ इतर अधिकारी आदर्श घेईल का ?
वणी वृत्तवेध : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन करत अनावश्यक वाहन वापर टाळण्याचे आणि पेट्रोलची बचत करण्याचे संदेश देशवासीयांना दिल्यानंतर आता प्रशासनातील अधिकारीही त्याचा अवलंब करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील मंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी थेट आपल्या निवासस्थानावरून सायकलने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सकाळच्या वेळी एसपी स्वतः सायकलवरून कार्यालयाकडे जात असल्याचे पाहून नागरिकांसह पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारीही आश्चर्यचकित झाले.

एसपींच्या या कृतीमुळे इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि साधेपणाचा संदेश प्रशासनात पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. “वरिष्ठ अधिकारी स्वतः पुढाकार घेत असतील तर आपणही बदलायला हवे,” अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे.


विशेष म्हणजे, आतापर्यंत आलिशान वाहनांतून फिरणाऱ्या काही अधिकाऱ्यांची मात्र यामुळे चांगलीच गोची झाली आहे. आता कार्यालयात येताना पायदळ किंवा सायकलचा पर्याय स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर येणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंतांच्या या सायकल स्वारीने केवळ इंधन बचतीचा संदेश दिला नाही, तर इतर अधिकाऱ्यांनाही जबाबदारीची जाणीव करून देत “बदल स्वतःपासून सुरू करा” हा प्रभावी संदेश दिला आहे.









