Home Social रेल्वे आली… पण श्रेयाच्या डब्यात जागा कमी!

रेल्वे आली… पण श्रेयाच्या डब्यात जागा कमी!

◆ भाजपा मध्ये श्रेयवादाची लढाई

वणी वृत्तवेध :- बल्लारशाहा – मुंबई – बल्लारशाहा ही नवीन रेल्वे सुरू होताच प्रवाशांपेक्षा आधी “श्रेय एक्सप्रेस” सुटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रेल्वे मंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवत गाडी सुरू केली खरी, पण आता ही गाडी नेमकी कुणाच्या प्रयत्नाने धावली यावर भाजपातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये अदृश्य शिट्टी वाजली आहे.

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनीही “ही रेल्वे माझ्याच पाठपुराव्यामुळे सुरू झाली” असा दावा केल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर तर समर्थकांनी जुनी पत्रे, निवेदने, फोटो, रेल्वे स्टेशनवरील सेल्फी आणि चहाच्या टपरीवरील चर्चादेखील पुरावा म्हणून पुढे आणल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सामान्य प्रवासी मात्र गोंधळात पडले आहेत. काहींनी तर “तिकीट कुणाकडून घ्यायचं? अहिर गट की मुनगंटीवार गट?” असा मिश्कील सवाल उपस्थित केला आहे. तर काही जणांनी “रेल्वेच्या इंजिनावर दोघांचेही फोटो लावा आणि विषय संपवा” अशी मध्यस्थीची भूमिकाही घेतली आहे.

विशेष म्हणजे रेल्वेमंत्री अस्विनी वैष्णव यांनी दोन्ही नेत्यांना स्वतंत्र पत्र पाठवत “आपल्या मागणीची दखल घेण्यात आली” असे म्हटल्याने आता श्रेयाचा चेंडू पुन्हा जनतेच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे “रेल्वे एकच… पण श्रेयाचे दोन डबे!” अशी चर्चा रंगली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय कुरघोड्या काही नवीन नाहीत. मात्र यावेळी रेल्वे सुरू झाल्याने जनता खूश आहे. आता सर्वसामान्य नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली मागणी, “चंद्रपूर – पुणे रेल्वे सुरू करा… श्रेय कुणीही घ्या!पण गाडी सुरू करा असा सल्ला दिला जात आहे.
एकंदर काय, रेल्वे रुळावर आली असली तरी श्रेयाची गाडी अजूनही फुल स्पीडने धावत आहे!

Previous articleबदलाची सुरुवात स्वतःपासून एसपी सायकलवर
Next articleअखेर जलकुंभ परिसरात टिनाचे कुंपण
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे