◆ युवक किरकोळ जखमी
◆ विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर
वणी वृत्तवेध :वणी शहरातील दत्त मंदिर परिसरात बुधवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसने दुचाकीला ज धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी झाला असून तो अल्पवयीन असल्याची माहिती आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर

वणी शहर व परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठी असून हजारो विद्यार्थ्यांची दररोज स्कूल बस व खासगी वाहनांद्वारे वाहतूक केली जाते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने शालेय वाहनांसाठी कठोर नियम लागू केले असले तरी प्रत्यक्षात अनेक वाहनधारक नियमांचे पालन करत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

नियमांनुसार शाळेची बस पिवळ्या रंगाची असणे, “SCHOOL BUS” असे स्पष्ट लिहिलेले असणे, वैध फिटनेस प्रमाणपत्र, विमा, परमिट व प्रदूषण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच GPS, CCTV, अग्निशामक यंत्र, फर्स्ट एड बॉक्स, स्पीड गव्हर्नर, प्रशिक्षित चालक व विद्यार्थ्यांसाठी अटेंडंट असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. बसचा वेग ४० किमी प्रतितासपेक्षा अधिक नसावा, असे स्पष्ट निर्देश आहेत.तसेच अनेक खाजगी वाहनांनी चक्क शाळेचा संबंध नसतांना शाळेचे नाव वाहनावर लिहिले आहे.


वणी परिसरातील अनेक शालेय खाजगी वाहनांमध्ये या नियमांचे पालन होते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित परिवहन विभाग व शिक्षण विभागाकडून नियमित तपासणी केली जाते का, याबाबतही पालकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.
आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासन, वाहनचालक आणि संबंधित विभागांनी केवळ नियमांची पूर्तता कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळायची असेल तर शालेय वाहनांची विशेष मोहीम राबवून तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या बसचा लग्नसराईत वापर?
वणी शहर व परिसरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या काही स्कूल बसचा वापर लग्न समारंभ व खासगी कार्यक्रमांसाठी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेली वाहने व्यावसायिक कारणांसाठी वापरणे नियमबाह्य मानले जाते. शालेय वाहनांना दिलेले परमिट हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीपुरते मर्यादित असताना अशा प्रकारामुळे नियमांची पायमल्ली होत आहे. संबंधित परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन तपासणी करावी, अशी मागणी जोरधरत होत आहे.








