◆ पंप दुरुस्तीचे काम पूर्ण
◆ वणीकरांना मोठा दिलासा
वणी वृत्तवेध :गेल्या तीन-चार दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या पंपामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झालेला वणी शहराचा पाणीपुरवठा अखेर आज, दि. २५ मेपासून सायंकाळी पूर्ववत सुरू होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगरपालिकेकडून पंप दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले असून नियमित पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

वणी शहराला वर्धा नदीवरील रांगणा-भुरकी घाट परिसरातून पाणीपुरवठा केला जातो. आवश्यकतेनुसार नवरगाव धरणाचाही वापर केला जातो. मात्र शहरातील जलशुद्धीकरण केंद्र जुने व कालबाह्य झाल्याने वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता सुमारे ३० हजार लोकसंख्येसाठी आहे. परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तारित हद्द लक्षात घेता ही क्षमता अपुरी ठरत आहे. परिणामी जुन्या पंपांमध्ये सतत बिघाड होत असून पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे.


गेल्या चार दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अनेक भागांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. मात्र आता पंप दुरुस्ती पूर्ण झाल्याने आज सायंकाळपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी नगरपालिकेने जलशुद्धीकरण केंद्राचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.








