Home Breaking News दुचाकीवरील पिशवीतील पन्नास हजार लंपास

दुचाकीवरील पिशवीतील पन्नास हजार लंपास

◆ चोरटा तिसऱ्या डोळ्यात कैद

वणी वृत्तवेध :- शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक परिसरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी हातचलाखी करत दुचाकीला लटकवलेल्या पिशवीतील तब्बल ५० हजार रुपये लंपास केल्याची घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालगुडा येथील शंकर धोटे यांनी वणी येथील स्टेट बँकेतून खरेदीसाठी ५० हजार रुपये काढले होते. पैसे एका पिशवीत ठेवून त्यांनी ती दुचाकीच्या हँडलला अडकवली आणि ते निघाले. मात्र त्यांच्यावर चोरट्यांची आधीपासून नजर होती.

दरम्यान, चोरट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी अंगावर घाण टाकली. अचानक अंगावर घाण पडल्याने धोटे हे गांधी चौकातील देवडे यांच्या किराणा दुकानाजवळ थांबले व शर्ट साफ करू लागले. याच संधीचा फायदा घेत मागावर असलेल्या चोरट्याने दुचाकीला लटकवलेली पैशांची पिशवी क्षणार्धात लंपास करून घटनास्थळावरून पोबारा केला.

हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान, पोलिसांनी अनेकदा नागरिकांना बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर कुठेही न थांबता थेट घरी जाण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Previous articleशिस्तीचा ध्यास जपणारे क्रीडा गुरु हरपले
Next articleमोरेश्वर उज्वलकर विधान परिषदेच्या रिंगणात ?
wani vruttvedh
वणी परिसरातील प्रत्येक हालचालीकडे केवळ ‘बातमी’ म्हणून नाही, तर ‘जबाबदारी’ म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. वणी वृत्तवेध हे केवळ न्यूज पोर्टल नसून, जनतेचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे अफवा नाहीत, इथे गाजावाजा नाही—इथे असते तथ्यांची पडताळणी आणि मुद्द्यांचा थेट वेध. कोणत्याही दबावाला न जुमानता, कोणत्याही स्वार्थाला बळी न पडता, जे आहे ते स्पष्टपणे मांडणे, हीच आमची ओळख असेल. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर केवळ माहिती देणे नाही, तर त्या मागचं वास्तव, परिणाम आणि जबाबदारी उघड करणं—हा वणी वृत्तवेधचा मार्ग असेल. कारण आमच्यासाठी बातमी म्हणजे फक्त शब्द नाहीत… तर जनतेच्या हक्काचा आवाज आहे