◆ सेवाभावाचा झरा आटला
◆ पाण्याचा धर्म बाटली बंद
वणी वृत्तवेध : अनिल बिलोरिया
उन्हाळ्याची चाहूल लागली, की पूर्वी शहरात चौकाचौकांमध्ये पाणपोई दिसायच्या. पारा जसजसा भडकायचा तसतशी या पाणपोईवर वर्दळही दृष्टीस पडायची. रस्त्याने जाता-येता घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले, की हायसे वाटायचे. मात्र आता शोधूनही या पाणपोई सापडत नाहीत . त्यामुळे तो सेवाभावाचा गारवाही अनुभवणे आता दुरापास्त होऊन बसले आहे,समाजातली सह्दयता संपली की काय, असे वाटण्या इतकी भिषण परिस्थिती आज पाहावला मिळत आहे.

तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच पूर्वी ढिगाऱ्याने काम करणाऱ्या संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, राजकीय संघटना सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढे यायच्या. सेवा समिती, मंदिर समिती, मंदिर ट्रस्ट, रोटरी क्लब, लायन्स क्लब, नागरिक संस्था, बहुतांश सर्वच राजकीय पक्षांच्या शाखा पाणपोईचा हा उपक्रम राबवायच्या.

उन्हाळ्याच्या आधीपासूनच त्याचे प्लानिंग केले जायचे. शिवाय काही संवेदनशील नागरिकदेखील स्वतःच्या घरासमोरील जागा पाणपोईसाठी उपलब्ध करून द्यायचे. नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य लाभावे, या उद्देशाने सेवाभावातून हे काम केले जायचे. सर्वांना दृष्टीस पडेल अशा जागी पेंडॉल उभा करून तिथे चार-दोन रांजणभर पाणी ठेवले जायचे. पाणी वाटपासाठी एक व्यक्तीही तिथे सेवा द्यायची. रस्त्याने फिरताना तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली, की आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरवायची आणि नंतरच पुढचा मार्ग धरायची. काही वर्षांपूर्वी शहरातल्या चौकाचौकांमध्ये हे चित्र दृष्टीस पडायचे.


मात्र आज दुर्दैवाने अशा स्वरूपाचा कुठलाही उपक्रम सामाजिक सेवेच्या भावातून जपला जात नसल्याचे दिसत आहे. वास्तविक तहान कमी झालेली नाही. तरी समाजातला सेवाभाव संपत चालल्याने पाणपोईची संख्या मात्र झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. तहान कायम असली तरी पाणपोई गायब झाल्याची जाणीव मात्र प्रकर्षाने होत आहे.
बाटली बंद पाण्याने केली मात
पाणपोईचे कल्चर मागे पडण्यामागे फिल्टर वॉटर हे एक आणखी मोठे कारण सांगितले जाते. बाटलीबंद पाणी कुठेही उपलब्ध होते. शिवाय पाण्याची बॉटल मिळतात. पानठेल्यांवरही हे बॉटल मिळतात. त्यामुळे साहजिकच पाणपोईवर बॉटलने मात केल्याचे सांगितले जाते








