मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून वेळोवेळी जप्त केले 340 स्टार कासव चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गमुक्त करण्यात आले. महाराष्ट्र वन विभागाने यासाठी राबविलेल्या प्रकल्पात या सर्व कासवांना निरीक्षणाअंती टप्प्याटप्प्याने निसर्ग मुक्त करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे हे कासव लोकं आवडीने घरात पाळतात म्हणून यांची तस्करी होते. यांचा आकार पाहून २ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत यांची विक्री होते. आतापर्यंत तस्करांकडून जप्त केलेले कासव कर्नाटक राज्यात सोडले जायचे पण चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात या कासवांचा नैसर्गिक अधिवास होता आणि हा भाग त्यांना निसर्गमुक्त करण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे हे कासव चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागातील जंगलात सोडण्यात आले. नव्या पिढीचे वन्यजीव प्रेमी तयार करण्याच्या दृष्टीने राजुरा येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यात आले.








