Chandataknews
New delhi
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. सोमवारी संध्याकाळी, संसद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला. हा राजीनामा संविधानाच्या अनुच्छेद ६७ (अ) नुसार देण्यात आला असून, वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पत्रात उल्लेख केले आहे.
धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रीमंडळ, तसेच सर्व खासदारांचे आभार मानले. “माझ्या कार्यकाळात राष्ट्रपतींशी सौहार्दपूर्ण आणि शांत वातावरणात काम करता आले, याचा मी अत्यंत आभारी आहे. खासदारांकडून मिळालेला विश्वास, प्रेम व पाठिंबा कायम स्मरणात ठेवेन,” असे त्यांनी नमूद केले आहे.
जगदीप धनखड यांनी ६ ऑगस्ट २०२२ रोजी १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
त्यांच्या कार्यकाळाचा कालावधी २०२७ पर्यंत होता.
संसदेचे अधिवेशन सुरू असताना राजीनामा देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले आहेत.
उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी ७२५ पैकी ५२८ मते मिळवत विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. अल्वा यांना १८२ मते मिळाली होती.
अचानक दिलेल्या राजीनामा संबंधी राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत, मात्र अधिकृतपणे प्रकृती कारणच नमूद करण्यात आले आहे.धनखड यांचा राजीनामा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा घटनाक्रम ठरला आहे. त्यांच्या स्थानावर नवीन उपराष्ट्रपती निवड करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होईल, अशी शक्यता आहे.









